फळबाग लागवडीसाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

<em>फळबाग लागवडीसाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन</em>

बारामती दि. ५: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२२-२३ अंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

बारामती उपविभागास फळबाग लागवड योजनेसाठी १ हजार ९२० हेक्टर फळपिके लागवडीचे लक्षांक दिले असून ऑगस्ट अखेर १ हजार २३७ हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना प्रशासकीय मान्यता व १ हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना तांत्रिक मंजूरी मिळाली आहे.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सलग क्षेत्रावर फळबाग व बांधावर फळझाडे लागवडीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी सबंधीत गावातील कृषि सहाय्यकाकडे अर्ज करावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

    अशी आहे योजना

फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा,चिकू, पेरू, डाळिंब, का.लिंबू, संत्रा, मोसंबी, सिताफळ, नारळ, आवळा, अंजीर,जांभुळ, चिंच, फणस, शेवगा, काजू, ड्रॅगनफ्रुट, अॅ व्होकॅडो, केळी व द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. गुलाब, मोगरा व निशीगंध या फुलपिकांच्या लागवडीसाठी सुध्दा परवानगी देण्यात आलेली आहे. अकुशल कामगारांना २५६ रुपये प्रति दिन प्रमाणे मजुरीदर आहे.

रासायनिक खतांचा खर्च अर्थिक मापदंडातून वगळण्यात आला असून त्याऐवजी नाडेप कंपोस्ट व गांडुळ खताचा अधिक वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु देय अनुदान व फळपीक लागवडीचे निकष विद्यापीठ शिफारशीनुसारच मर्यादित राहील. अतिरीक्त कलमे/रोपे यांचे अनुदान देय राहणार नाही.

लागवड वर्षासह सलग ३ वर्षात मंजुर अंदाजपत्रकानुसार अनुदान देय राहील. दुस-या व तिसऱ्या वर्षी बागायती फळपिकांकरीता जे लाभार्थी ९० टक्के फळझाडे जिवंत ठेवतील व कोरडवाहू फळपिकांकरीता ७५ टक्के फळझाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुस-या व तिसऱ्या वर्षाचे अनुदान देय राहील. वैयक्तिक बांधावरील फळपिके लागवडीसाठी हेक्टरी २० रोपे या मर्यादेत फळपिकांची लागवड ही योजना राबविण्यात येत असून यासाठीदेखील अनुदान देय आहे.

            

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )