‘देशाची घटना बदलण्यासाठी हव्यात दोन तृतीयांश जागा’, भाजप उमेदवाराच्या वक्तव्याने वाद

‘देशाची घटना बदलण्यासाठी हव्यात दोन तृतीयांश जागा’, भाजप उमेदवाराच्या वक्तव्याने वाद

भाजप राज्य घटनेत बदल करणार असल्याचा आरोप अनेकदा इंडिया आघाडीकडून करण्यात येतो. तर भाजप नेहमी आरोप फेटाळण्यात येतो. पण उत्तर प्रदेशातील खासदार लल्लू सिंह यांच्या एका वक्तव्याने भाजप कोंडीत सापडला आहे. सरकार तर 272 खासदारांच्या बळावर सत्तेवर येते. पण देशाची राज्यघटना बदलण्यासाठी केवळ दोन तृतीयांश जागा हव्या असल्याचे वादग्रस्त वक्तव्य सिंह यांनी केले आहे. ते फैजाबाद या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहे. तर विद्यमान खासदार पण आहेत. समाजवादी पक्षासह काँग्रेसने आता भाजपला या मुद्दावर घेरले आहे.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
लल्लू सिंह यांचा यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ” राज्यघटनेत सुधारणा करावी लागणार आहे. अनेक काम करायची आहेत. सरकार तर 272 जागांवर येते, पण केवळ 272 खासदारांच्या जीवावर राज्य घटनेत सुधारणा होऊ शकत नाही. नवीन राज्य घटना तयार करण्यासाठी दोन तृतीयांशापेक्षा अधिक बहुमत लागते, अधिक जागा लागतात.”, असे वादग्रस्त वक्तव्य लल्लू सिंह यांनी केले आहे.
हा तर आरक्षण संपविण्याचा डाव

भाजप खासदाराच्या या बेताल वक्तव्याचा समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला. अखिलेश यादव यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजप, जनतेची सेवा वा कल्याण करण्यासाठी सत्तेत येत नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना तयार केली, ते बदलण्यासाठी येत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.
आम्ही PDA च्या साथीने भाजपला हरवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्यांकांना मिळणारे आरक्षण, नवीन राज्यघटनेआधारे संपविण्याच्या बेतात असल्याचा गंभीर आरोप यादव यांनी केला. अनेक शतकांपासून 4-5 टक्के लोक 90-95 टक्के लोकांना गुलाम करु इच्छित आहेत. मागासवर्गीयांच्या मदतीने भाजपला हरविणार असल्याचा दावा त्यांनी केला.
निवडणूक आयोगाने तात्काळ अशा वक्तव्याची गंभीर दखल घेण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीला हात घालण्याचा हा प्रकार लोकशाहीला धोकादायक असल्याचे यादव म्हणाले. आमचे अधिकार संपविण्याची भाषा करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन करण्यासारखे नाही का, असा सवाल जनता विचारत असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून म्हटले. काँग्रेसने पण लल्लू सिंह यांच्या वक्तव्यावर कडाडून टीका केली.

लल्लू सिंह करतील हॅटट्रीक?
भारतीय जनता पक्षाने फैजाबाद लोकसभा मतदारसंघातून लल्लू सिंह यांना तिसऱ्यांदा तिकीट दिले आहे. लल्लू सिंह यांनी 2019 मध्ये समाजवादी पक्षाचे आनंद सेन यादव यांना हरवले होते. तर त्यापूर्वी 2014 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाचे मित्रसेन यादव यांना धूळ चारली होती.फैजाबादमध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे.