पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

पुणे, दि. २९ : कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सूर्यफूल या पिकांसाठी आयोजित पीक स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी पीकस्पर्धा राबविण्यात येते.

स्पर्धेसाठी अटी व शर्ती:

स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटासाठी ३०० रूपये व आदिवासी गटासाठी १५० रूपये प्रमाणे प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क असेल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असावी व ती जमीन तो स्वत: कसत असावा. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल.

पीकस्पर्धेत सहभाग घेण्याकरिता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर एक एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार असून स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :-
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र, स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खात्याच्या चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील.

सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीकनिहाय बक्षीस तालुका पातळीवर प्रथम क्रमांकासाठी ५ हजार, द्वितीय ३ हजार व तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये, जिल्हा पातळीवर १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये तर राज्यपातळीवर प्रथम ५० हजार द्वितीय ४० हजार तसेच तृतीय ३० हजार रुपये बक्षीस असेल.

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी https://krishi.maharashtra.gov.in या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )