‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बारामती उप विभागात विशेष मोहीम

‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बारामती उप विभागात विशेष मोहीम

बारामती दि. २२ : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बारामती उप विभागात ३१ मे पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी उप विभागीय कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी एम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास २ हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रती वर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषि विभागासह गावातील पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवून लाभार्थ्यांची जास्तीत जास्त बँक खाती आधार क्रमांकाशी जोडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत १४ व्या हप्त्याचा लाभ माहे मे किंवा जून मध्ये जमा होणार असून केंद्र शासनाने १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. बारामती उप विभागात बारामती तालुक्यात ८ हजार ८५५, दौंड तालुक्यात ९ हजार ६६९, पुरंदर तालुक्यात ८ हजार २०२ आणि इंदापूर तालुक्यात १० हजार ३११ अशी एकूण ३७ हजार ३७ लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात १४ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांक इत्यादीच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडीया पोस्ट पेमेंट बँकत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थीना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही.

पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थीची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून तो आधार क्रमांकास जोडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक कार्यालयास उप विभागातील गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थीना संपर्क करून आयपीपीबी मध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने ३१ मे २०२३ अखेर गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे.

खाते उघडण्यासाठी लाभार्थीनी फक्त आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. कृषि विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक मार्फत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमध्ये बारामती उप विभागातील सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषि विभागातून करण्यात आले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )