पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पुणे, दि. ७ : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन २०२३-२४ मृग बहार मध्ये डाळिंब, पुरू, चिकु, लिबू, संत्रा, मोसंबी, सिताफळ व द्राक्षे क या फळपिकांना लागू करण्यात आली असून या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातीत अधिसूचित पिकासाठी ऐच्छीक आहे. उत्पादनक्षम फळबागांनाच विमा सरंक्षणाचे कवच लागू राहणार आहे. नुकसान भरपाई महावेध प्रकल्पातंर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्रांच्या आकडेवारी नुसार ठरविण्यात येते.

खेड, दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर, पुरंदर, शिरुर व हवेली या तालुक्यातील डाळिंब फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जुलै असून विमा संरक्षित रक्कम १ लाख ३० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ६ हजार ५०० रुपये इतकी आहे.

इंदापुर, खेड, पुरंदर, हवेली, भोर, बारामती, दौंड व शिरूर या तालुक्यातील पेरु फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जून असून विमा संरक्षित रक्कम ६० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ३ हजार रुपये इतकी आहे.

आंबेगाव, इंदापूर, दौंड, भोर, जुन्नर, शिरूर व बारामती या तालुक्यातील चिकु फळपिकासाठी अंतिम मुदत ३० जून असून विमा संरक्षित रक्कम ६० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम १३ हजार २०० रुपये इतकी आहे.

इंदापूर, शिरुर, बारामती व दौंड या तालुक्यातील लिंबू फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जून असून विमा संरक्षित रक्कम ७० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ४ हजार ५५० रुपये इतकी आहे.

शिरुर तालुक्यातील संत्रा फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जून असून विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ६ हजार रुपये इतकी आहे. इंदापूर व शिरुर या तालुक्यातील मोसंबी फळपिकासाठी अंतिम मुदत ३० जून असून विमा संरक्षित रक्कम ८० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ४ हजार रुपये इतकी आहे.

आंबेगाव, इंदापूर, खेड, जुन्नर, दौंड, पुरंदर, बारामती, भोर व शिरुर तालुक्यातील सिताफळ फळपिकासाठी अंतिम मुदत ३१ जूलै असून विमा संरक्षित रक्कम ५५ हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम ६ हजार ३२५ रुपये इतकी आहे.

इंदापूर व बारामती तालुक्यातील द्राक्षे क फळपिकासाठी अंतिम मुदत १४ जून असून विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये तर शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्त्याची रक्कम १६ हजार रुपये इतकी आहे.

शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी मृग बहारातील फळपिकांची विमा नोंदणी करीता भारतीय कृषि विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १८०० ४१९ ५००४, दूरध्वनी क्रमांक ०२२-६१७१०९१२ व ई-मेल आय डी – pikvima@aicofindia.com वर संपर्क साधावा. अधिसुचित क्षेत्रातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )