पुणे, दि.२७ : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना २०२१ आंबिया बहार फळपिकांना लागू करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देण्यासाठी लागू करण्यात आलेल्या या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी आहे. कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातीत अधिसूचित पिकासाठी ऐच्छीक आहे. उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. या योजनेत नुकसान भरपाई महावेध प्रकल्पांतर्गत महसूल मंडळस्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार ठरविण्यात येणार आहे, त्यामुळे मानवी हस्तक्षेप राहणार नाही.

या योजनेत पिकनिहाय सहभागाची अंतिम मुदत, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता याबाबत माहिती पुढीलप्रमाणे आहे. दौंड, आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, हवेली, शिरुर, वेल्हा, मुळशी, बारामती, इंदापुर, सासवड या तालुक्यात आंबा पिकासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर २०२१ असून विमा संरक्षित रक्कम हेक्टरी १ लाख ४० हजार रुपये एवढी आहे. शेतकऱ्यांनी १५ हजार ४०० रुपये एवढा विमा हप्ता भरावयाचा आहे.

दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापुर, सासवड, शिरुर, हवेली, खेड या तालुक्यात डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२२ अंतिम मुदत असून विमा संरक्षित रक्कम रुपये हेक्टरी १ लाख ३० हजार रुपये आहे. शेतकऱ्यांनी ९ हजार ७५० रुपये विमा हप्ता भरावयाचा आहे.

आंबा पिकासाठी विमा संरक्षण कालावधी ३१ मे २०२२ पर्यंत असून शेतकरी हिस्सा यासह केंद्र, राज्य असा एकूण विमा हप्ता ६५ हजार ८०० रुपये आहे. तर डाळिंब पिकासाठी विमा संरक्षण कालावधी १५ जानेवारी ते ३१ जुलै २०२२ असा असून एकूण विमा हप्ता ५२ हजार रुपये एवढा आहे.

अधिक माहितीसाठी भारतीय कृषी विमा कंपनीच्या pikvima@aicofindia.com ईमेलवर अथवा टोल फ्री क्र. १८००४१९५००४ किंवा ०२२६१७१०९१२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *